मुंबई : अकोट नगरपरिषदेत भाजपने चक्क एमआयएमला सत्तेसाठी सोबत घेतल्याने राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. बहुमतासाठी भाजपने अकोट विकास मंच स्थापन केला. या अकोट विकास मंचमध्ये भाजपनंतर सर्वाधिक जागा जिंकणारा एमआयएम, शिंदेंची शिवसेना, ठाकरेंची शिवसेना, अजित पवारांची राष्ट्रवादी, बच्चू कडूंची प्रहार जनशक्ती सहभागी झाली आहे. तर अंबरनाथमधून भाजप आणि काँग्रेसची युती होत असल्याचे वृत्त आहे. या दोन्हीही युतीचे वृत्त समजताच भाजप आणि काँग्रेसने अशी युती होणार नसल्याचे म्हटले आहे.
अकोटमध्ये भाजपने सत्तेसाठी चक्क ऑल इंडिया इत्तेहादूल मुस्लिमीन सोबत हातमिळवणी केली आहे. त्यामुळे राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. तर भाजपवर चोहोबाजूंनी टीका होत आहे. इतकेच नाही तर अंबरनाथमध्ये सुद्धा काँग्रेससोबत हातमिळवणी करण्याचे मोठे धाडस स्थानिक भाजप नेतृत्वाने दाखवले आहे. कटोगे तो बटोगेचा नारा आणि आता थेट एमआयएमशी हातमिळवणी यामुळे भाजपवर टीकेची झोड उठली आहे. नुकत्याच झालेल्या नगरपालिका निवडणुकीत अकोटमध्ये भारतीय जनता पार्टीच्या माया धुळे या नगराध्यक्षपदी विजयी झाल्या. पण बहुमताचा आकडा गाठण्यासाठी भाजपला मोठी खेळी खेळावी लागली. विचारधारेशी फारकत घ्यावी लागली.
अकोट विकास मंचाचा हा प्रयोग राज्यात गाजला. कारण या मंचात भाजप ११ जागांनिशी आघाडीवर आहे. तर एमआयएम ५ जागांसह दुसर्या क्रमांकाचा पक्ष ठरला आहे. या मंचात दोन्ही शिवसेना, दोन्ही राष्ट्रवादी आणि बच्चू कडू यांच्या प्रहारचे नगरसेवक आहेत. अकोटमध्ये एकूण ३३ सदस्य आहेत. त्यात अकोट विकास मंचाचे २५ सदस्य आणि नगराध्यक्ष पदाच्या माया धुळे मिळून २६ जण झाले आहेत. तर काँग्रेसचे ६ आणि वंचितचे २ सदस्य हे विरोधी गोटात असतील.
अंबरनाथमध्ये शिंदे गोटाला खो, काँग्रेसच्या हातात कमळ
ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ नगरपरिषदेतही असाच अनोखा प्रयोग झाला आहे. येथे मित्रपक्ष शिंदे गटाला खो देत भाजपने काँग्रेसच्या हातात कमळ दिले आहे. या नगरपरिषदेत भाजप आणि काँग्रेसने सत्तेसाठी हातमिळवणी केली आहे. या नवीन सत्ता समीकरणावर शिंदे सेना नाराज झाली आहे. तर दुसरीकडे काँग्रेसमधूनही नाराजीचा सूर आळवण्यात आला आहे. पण भाजपने दोन्ही ठिकाणी दाखवलेल्या धाडसाची राज्यभर चर्चा रंगली आहे.
भाजप नेते उत्तर देतील
याप्रकरणी खासदार श्रीकांत शिंदे यांनी खास उत्तर दिले आहे. अकोटमध्ये भाजप एमआयएम युतीविषयी त्यांना विचारले असता हा भाजपचा प्रश्न असल्याचे ते म्हणाले. याप्रश्नावर भाजपचे नेते उत्तर देतील असे त्यांनी सांगितले. तर अंबरनाथमध्ये आम्ही काँग्रेसच्या विरोधात उठाव केला होता. काँग्रेसला आमचा विरोध होता आणि राहील, असे ते म्हणाले. राज्यात आणि केंद्रात महायुती आहे, त्यामुळे आम्ही अशी आघाडी केली नाही असा टोलाही शिंदेंनी लगावला.
मुख्यमंत्री अकोट आणि अंबरनाथ पॅटर्नवर नाराज
दरम्यान अकोट आणि अंबरनाथ पॅटर्नवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाराजी व्यक्त केली आहे. स्थानिक पातळींवर झालेल्या एमआयएम आणि कांग्रेससोबतच्या आघाडीवर तीव्र नाराजी व्यक्त केल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे. अकोटमध्ये भाजप आणि एमआयएम तसेच अंबरनाथमध्ये भाजप आणि कांग्रेस अशी युती झाल्याने मुख्यमंत्र्यांकडून स्थानिक नेत्यांवर नाराजी व्यक्त केल्याचे समजते. आता याप्रकरणी पुढे काय घडामोडी घडतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.